तो आणि ती

तो आणि ती...

ती एकदम बडबडी , मुक्त , स्वच्छंद,talkative...
तो मात्र जरा अबोल , स्वैर , आत्ममग्न...
तिच्या पटापट ओळखी व्हायच्या , बोलघेवडी होती नं...
त्याचा स्वभाव मात्र जरा कठोर , मोजून मापून , अंदाजानं बोलणारा . यामुळं मोजकंच मित्रमंडळ त्याचं...
ती सर्वांशी मिळून मिसळून राहणार , सगळ्यांशी गोड बोलणार , हसत खेळत वागणार...
तो मात्र जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबतच मजा करणार , बाकीच्यांशी बोलताना मात्र १ घाव २ तुकडे...
तिचे १७६० मित्र...
त्याची १८५६ भांडणं...
तिला बोलायची आवड...
तासनतास एकटं बसून राहायची त्याची पहिली निवड...
ती सर्वांशी openly बोलायची , अगदी मुलांशीपण...
तो जरा हातचं राखून बोलणारा , सगळ्याच मुलींशी नाही पटायचं त्याचं , त्याच्या मित्रमंडळात असतील तितक्याच...
तिचा स्वभाव मृदू , मनमिळावू , खेळकर , संवेदनशील...
तो मात्र जरा कठोर , उग्र , तापट...
१ उत्तर ध्रुव , तर २ दक्षिण ध्रुव 
#Extremities...
पण यांना सांधणारा एक दुवा होता...
हो...
तो दुवा म्हणजे एक स्पर्धा होती , एक Inter-Collegiate विविध गुणदर्शन स्पर्धा...
त्यांच्या कॉलेजचा त्या स्पर्धेत सतत दबदबा असायचा , त्यांच्या कॉलेजचं नाव ऐकून प्रतिस्पर्धी बिथरत!!!
आता इतक्या मोठ्या स्पर्धेत आपलं नाव जपायचं म्हणजे तयारी जोरदार हवी नं...
आणि सराव तर खूप महत्त्वाचा!!!
तर , मोठ्या स्पर्धेची तयारी म्हणून त्यांच्या ग्रुपनं , मोठ्या स्पर्धेसाठी लागणारा performance , स्पर्धेच्या १ महिना अगोदर , छोटेखानी पातळीवर करायचा ठरवला. म्हणजे , मोठ्या स्पर्धेची तयारी तर होईलच ; पण जे नवीन आहेत , त्यांनाही स्पर्धेच्या स्वरूपाची तोंडओळख होईल , हा हेतू...
स्पर्धेप्रमाणेच विभागांचं वर्गीकरण झालं आणि प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली . त्याला त्याची त्याची जबाबदारी मिळाली आणि तो त्याच्या कामाला लागला , बाकीचे सगळे विचार सोडून . त्याचं एक होतं , ते म्हणजे त्याला त्याच्या कामात मधे-मधे केलेलं आवडायचं नाही अजिबात...
ती मात्र या सगळ्याला नवीन होती . तिच्यासाठी हा सराव म्हणजे स्पर्धेची तोंडओळख होती . ती तिच्या परीनं सगळं समजून घ्यायच्या प्रयत्नात होती . तो मात्र त्या वातावरणात २ वर्ष रुळलेला...
हे सांगायचं कारण म्हणजे त्यांची पहिली भेट...
ह्याच छोटेखानी प्रयोगा-अगोदर सर्वांना विश्रांती होती . Energy save करण्यासाठी दिलेली...तो कधीच अशी विश्रांती वगैरे घ्यायचा नाही . त्या वेळात त्याचं संध्याकाळचं planning चाललेलं . मागून आवाज आला , "Hi" . ती उभी होती .
त्यानं नेहमीप्रमाणे कडू आवाजातच विचारलं , "काये...?" 

ती : अरे मी , मी जरा घरी जाऊन येऊ का?
तो : का?
ती : जाते ना , please , विश्रांती संपायच्या आत
       परत येईन नक्की.
तो : ठीक आहे , जा. आणि लक्षात ठेव , उशीर
       झाला , तर बाहेरूनच घरी जायचं . उद्या
       प्रयोग आहे . गांभीर्य असूदे जरा .
ती : हो , नक्की .
अशी त्यांची पहिली भेट ! जरा कोरडीच !
ती विश्रांतीचा वेळ संपायच्या आत परतली . परत त्याला जाऊन भेटली .
ती : ... , आले परत . अजून ५ मिनिटं बाकी
      आहेत बघ . Break संपायला !
तो : छान ! जा आता कामाला लाग .
ती : अरे , तुला काल बरं नव्हतं ना ?
तो : हो , ..... नाही नाही, असं नाही काही . मी
       ठीक ए ! का गं पण ?
ती : अरे काही नाही , ही गोळी घे . बरं वाटेल .
       मी जाते प्रॅक्टिसला . आणि हो , काळजी घे
       स्वतःची . Bye !

तो हातातल्या गोळीकडे बघतच राहिला ! खरंच , आजपर्यंत कुणी न सांगता इतकी काळजी घेतली नव्हती त्याची ! इतकं अगदी लक्षात ठेवून वगैरे ! त्याला आश्चर्यच वाटलं ! त्याच्या नकळत कोण त्याची काळजी करत असेल , असं त्याला वाटलं नव्हतं . त्यानं ते सगळे विचार सोडून प्रयोगावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं . नंतर तो ते सगळं विसरूनही गेला .

प्रयोग झाला . छान झाला . त्याच्या मनासारखा . या काळात तो मधल्या घडामोडी विसरूनही गेलेला .
स्पर्धेदरम्यानच्या काळात मात्र त्यांचं बोलणं हळूहळू वाढू लागलं . त्यांची मैत्री हळूहळू खुलू लागली . त्याला तिच्यासोबत मजा , मस्ती करायची सवय झाली . तिच्यासोबत वेळ घालवायला आवडू लागला . त्याला तिच्यासोबत राहायला खूप भारी वाटायचं . पण तिला काय वाटतं , हे त्याला माहित नव्हतं . त्यानं ते कधी जाणून घ्यायचाही प्रयत्न केला नाही . त्याला तिचा सहवास आवडायचा मात्र , खूप !
दरम्यानच्या काळात त्यांची मैत्री अधिक घनिष्ट झाली . लोहचुंबकाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवात असते , तितकी दाट ! त्याला तिची सवय नाही झाली , तर 'ती' च त्याची सवय झालेली . Daily Routine !

तिच्या आयुष्यात अनेक उलथापालथी...त्याला हळूहळू समजल्या . त्यामानानं त्याचं आयुष्य बरंच सरळमार्गी होतं . तिला त्याचा खूप आधार होता , आणि त्यालाही तिचा ! त्याच्या त्या मित्रमंडळात एका 'जवळच्या' व्यक्तीची भर पडली होती . खूप मजा करायचे ते . त्याला कधी तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं असेल तर तो तिला फोन करून बोलावून घ्यायचा , त्यांच्या 'signature' ठिकाणी . त्याला तिच्याशी संपर्क करायचं ते एकच माध्यम होतं . त्यांचा telephone ! कारण तिथल्या तिथं पत्र लिहिणं , शुद्ध वेडेपणा ! काही असो , पण त्यांची मैत्री अधिकाधिक घनिष्ट होऊ लागलेली...

परीक्षा सुरु झाल्या . संपल्या . त्यानंतर एक महिन्याची सुट्टी होती . तो आजोळी जाऊन फिरून आला family सोबत . पण मनात सतत तिचाच विचार सुरू होता . सुट्टीनंतर , त्यानं एक दिवस तिला विचारायचं ठरवलं , एकत्र येण्याविषयी ! त्यानं भेटीचं ठिकाण स्वतःच ठरवलं . तिचा होकार आला , तर तिला देण्यासाठी अंगठी घेतली , खड्याची . त्यात पाहिलं तर आपलं छोटेखानी प्रतिबिंब दिसायचं . सगळं जमवून आणलं त्यानं आणि तिला फोन केला... बंद ! Out of service !

हे ४-५ दिवस असंच चालू राहिलं . त्याला अगोदर वाटलं की , फोन बिघडला असेल , repairing ला दिला असेल . पण , खूप काळ गेला मध्ये . शेवटी न राहवून तो तिच्या घरी गेला . त्याच्या स्वागतासाठी एक भलं मोठ्ठं कुलूप आ वासून उभं ! त्यानं आजूबाजूला विचारपूस केली तेव्हा समजलं की , तिच्या आईची बदली झाली होती , कुठे , ते नाही कळलं ,आणि ती कॉलेज सोडून गेली होती !

"सगळं तर सांगायची , मग हे का नाही सांगितलं ? जाऊ दे , असेल काहीतरी कारण , किंवा या महिन्यादरम्यान आली असेल बदली ! म्हणून नसेल सांगता आलं . निकालाच्या दिवशी तरी येईल . तेव्हा बोलू . त्यांचा नवीन नंबर पण घेऊ !"
निकालाचा दिवस उजाडला . त्याच्या तिला भेटण्याच्या आशा पल्लवित झाल्या . कॉलेजला पोहोचला , तर कळलं , की तिची आई आलेली निकाल घ्यायला ! पुन्हा निराशा !

शेवटी त्यानं जे काही इतके दिवस घडलं ते एक गोड स्वप्न मानून विसरून जायचं ठरवलं . खरंच , किती सोप्पं असतं ना हे बोलायला . पण खूप त्रास होतो एखाद्याला विसरताना . कधी कधी नाहीच शक्य होत ! त्यात आणि इतक्या जवळच्या व्यक्तीला विसरायचं ते ही एक स्वप्न मानून , अशक्य होतं .
त्याच्या मनात एकदा हलका विचार विजेसारखा चमकून गेला , " खरंच , कुठे असेल ती ? काय करत असेल ? तिला मी आठवत असेन का ? " वगैरे...
बरीच वर्ष निघून गेली . पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं . त्याचं लग्न पण झालं . पण , त्यानं मात्र तिची ती एकमेव निशाणी जपून ठेवली होती ; ती सुरेख , गोड अगदी तिच्यासारखी सुंदर खड्याची अंगठी ; लग्नानंतरही ! त्याच्या पहिल्या प्रेमाची एकमेव निशाणी ! त्याला आजच्या पिढीचा खूप हेवा वाटायचा . कारण म्हणजे आजची संपर्काची साधनं ! Mobile , Facebook , whatsapp , insta , Snapchat , इत्यादी इत्यादी . त्यानं तिला Facebook वर शोधलंही , पण उपयोग शून्य ! त्याला नेहमी वाटायचं की , अशी साधनं माझ्या काळी असती , तर नक्कीच मी "तिला" गमावलं नसतं , कदाचित , कधीच.
होता होता एक दिवस त्याच्या एका जिवलग मित्राशी भेट झाली त्याची . खूप दिवसांनी भेटल्यामुळं बरंच काही बोलायचं होतं , मनमोकळेपणाने ! बारीक झालास , जाड झालास , उंच झालास , चेहरा किती बदलला वगैरे usual बोलण्यानंतर एक एक आठवणींची पोतडी उघडत अगदी मजेत वेळ चाललेला !
होता होता त्या मित्रानं त्याला म्हटलं , " अरे अलीकडे 'ती' दिसलेली . फिरायला आलेली . भेटलो मीच तिला स्वतःहून . " त्याला खूप विचारावासं वाटत होतं , "कुठं ? कुठं असते ती ?" पण त्यानं खूप प्रयत्नांती टाळलं.

तो : अरे व्वा ! काय म्हणाली ?
मित्र : काही नाही . मीच तिला तुझ्याविषयी
       विचारलं .
तो : ....
मित्र : अरे , जायच्या अगोदर म्हणे ती तुला
      भेटायला आलेली , आवर्जून . पण तुमच्या
      घराला कुलूप होतं ! So , तिचं तुला भेटायचं
      राहूनच गेलं . ती काहीतरी सांगणार होती
      म्हणे तुला त्यादिवशी , पण आता त्याचा
      काही उपयोग नाही म्हणाली !

तो : लग्न झालं का रे तिचं?
मित्र : अर्थातच !
तो : ...
मित्र : अरे ते सोड , नंबर देऊ का तिचा तुला ?
         घे...
तो : अरे , नाही , नको . तिचा नंबर मला नको
       देऊ , आणि माझा तिला...का दिलास
       तिला , येडच्याप?
मित्र : अरे व्वा ! याला म्हणतात bonding !
       कडक !
तो : का रे? असं का ?
मित्र : अरे तिला मी विचारलं की , नंबर देऊ का
       त्याचा? तर same टू same reply !
       इकडचा शब्द तिकडे नाही ! Ohhhhh!!!
       त्याचा नंबर मला नको देऊ आणि माझा
       त्याला ! व्वा!!!
       फक्त येडच्याप नाही म्हणाली !!!
तो : ....
मित्र : अरे , तुला जर इतकीच आवडायची तर तू
         विचारलं का नाहीस तिला अगोदरच ?
         इतके दिवस मध्ये वाट का बघितलीस ??
तो : अरे मला वाटायचं , की माझी family तिला
       सामावून नाही घेऊ शकणार . थोडी
       forward होती ती , आणि आमचे घरचे
       प्रथापालक . जमलंच नसतं , नक्कीच !
       एक दिवस मी सगळं सोडून तिला
       विचारायचं ठरवलेलं ; पण ,
       तिच्या बदलीचं कळलं मला मग ! त्यानंतर
       कधी contactच नाही झाला!! Direct आज
       तिच्याविषयी ऐकतोय तुझ्याकडून . हि बघ ,
       ही रिंग घेतलेली तिला द्यायला!!!
       जाऊ  दे ,सोड...
मित्र : कमाल आहात रे तुम्ही! खरंच , ग्रेट!!
      Salute!!!
तो : आता काय झालं ?
मित्र : अरे , मी तिला हेच विचारलं , इतके दिवस
       का थांबलीस , वगैरे ! तर तिचा same
       reply!!! Word to word!!!
       ती काय म्हणाली , माहितीये ?
तो : ....
मित्र : अरे ती म्हणाली की , मला असं वाटायचं ,
       की त्याची family मला सामावून नाही घेऊ
       शकणार , मला तो कितीही आवडत असेल
       तरी!!! पण , मी एकदा सगळे विचार सोडून
       त्याला विचारायचं ठरवलेलं . त्याच्यासाठी
       ही ring सुद्धा घेतलेली , हो म्हणाला तर
       त्याला द्यायला .माझ्याकडंच राहिली
       शेवटी!!! त्याला फोन केला त्या दिवशी ,तर
       कोणी उचलत नव्हतं . शेवटी मी न राहवून
       त्याच्या घरी गेले , तर कुलूप . त्याला
       बदलीचं पण सांगायचं होतं आणि नवीन
       गावातला पत्ता पण द्यायचा होता . त्यानंतर
      दुसऱ्याच दिवशी निघालो आम्ही गडबडीत .
      आईला joining ची घाई होती .
       त्याला भेटायचा संबंधच नाही आला परत ,
      आणि मी पण गावी नाही आले त्यानंतर ,
       कधीच...
तो : ती परत भेटू शकेल का तुला ?
मित्र : शक्यता आहे . मी जर इथलं काम
      आटपून घरी गेलो , तर . कारण ती २
      आठवड्यासाठी सुट्टीला आलीये . आणि
      नाही भेटली तरी online बोलूच शकतो . 
      का रे ?
तो : तिला माझा एक मेसेज देशील ?
मित्र : बस का , नक्की देईन ! बोल काय सांगू?
तो : काय सांगू नकोस ,
      ( एक गाणं मित्राला ऎकवत ) , हे फक्त तिला
       send कर . माझा तिच्यासाठी पहिला आणि
       शेवटचा message !
मित्र : आता तर मला काही बोलायचंच नाही !
तो : ....

मित्रानं त्याला तिचे chats दाखवले . तर ती म्हणालेली , कि त्याला माझा हा एकच , पहिला आणि शेवटचा message दे . आणि तो मेसेज म्हणजे "तेच" गाणं होतं , जे त्यानं मित्राला तिला पाठवायला सांगितलं होतं .
खरंच , हा योगायोगच होता की आणखी काही ते नाही माहित . पण , खरोखर ते एकमेकांना संपूर्ण ओळखत होते . एकमेकांची अजूनही काळजी करत होते . त्यांच्यातील mutual understanding जबरदस्तच म्हणावं लागेल ! देवानं हा जोडा बनवलेला , पण नियतीला तो नाही पटला , असंच म्हणावं लागेल !

खरंच , माणसाला खरं प्रेम आयुष्यात एकदाच होतं . मग ते वयाच्या कुठल्याही टप्प्यात होवो , ते होतं कधीतरी . ते जोडीदारावरही होऊ शकतं , एखाद्या लहानग्याशी होऊ शकतं किंवा एखाद्या वयस्क व्यक्तीचीही ! आणि असं प्रेम असणं , म्हणजे ती प्रत्येकवेळी जोडीदाराशी प्रतारणाच असते असं नाही . एखाद्यावर प्रेम असणं , ही ज्याची त्याची मानसिक गरज असते . आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी मन नक्कीच कुणाला तरी शोधत राहतं . अशाही काही गोष्टी असतात , ज्या आपण जोडीदाराशी मनमोकळेपणाने share नाही करू शकत कधीकधी . अशा वेळी मन एक घनिष्ट मैत्र शोधत राहतं . कारण , प्रत्येक जण शेवटी स्वतःच्या सुखाच्या शोधात असतो . स्वतःच्या सुखासाठी प्रत्येक जण स्वार्थी असतो . त्याला ते सुख मिळालं , की काही काळासाठी तरी तो स्वतःची दुःख , अडचणी विसरतो . पण अजून इतका acceptance नाही आला आपल्या समाजात , की लग्नानंतरही एखादा जोडीदारासोबत एखाद्यावर प्रेम करु शकतो . असं काही असेल तर , ती जोडीदाराशी केलेली प्रतारणा ठरते समाजात . "ती त्याची किंवा तिची मानसिक गरज असते , असं असण्यात काही गैर नाही , जर त्या जोडीदारांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असेल तर... " , हा acceptance येईल कधीतरी , पण त्यावेळी आपण कुठं असू काय माहित (!), खरं ना?
ते एकमेकांशी संपर्क साधण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते . त्यांचं नक्कीच एकमेकांवर प्रेम होतं , अजूनही असेल . पण , संपर्क होणार असं दिसल्यावर मात्र त्यांनी माघार घेतली ! असं का , यामागे त्यांची बरीच कारणं असतीलही , ती जाणून न घेण्यातच त्यांनी आणि बाकीच्यांनी धन्यता मानली . आपण विचार करूच शकतो , आणि आपल्याला समजतीलाही ती कारणं , नक्कीच !असो...
तो मित्राला bye करून निघाला . कानात earphones टाकून , "ते" गाणं ऐकत आणि हातातल्या अंगठीतल्या खड्यात त्याचं (की तिचं) प्रतिबिंब पाहत . खरोखर , आज त्याला सुटल्यासारखं वाटत होतं , सगळ्यातूनच !

सर्वांच्या पहिल्या प्रेमाला

आणि
त्या प्रेमाच्या जपलेल्या "निशाणी"ला 
समर्पित () !!!

©श्रेयस_जोशी


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नातं

अडथळ्याची शर्यत

संवाद